अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीची निर्मिती

 जनहो ! वाचा, अंतर्मुख व्हा, निर्णय घ्या !
अंधश्रध्दा निर्मूलन चळ्वळीत सामिल व्हा !
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या २९ वर्षापासून महाराष्ट्रात व इतर राज्यांत अंधश्रध्दा निर्मूलनचे कार्य करीत आहे.
अंधश्रध्दा निर्मूलन म्हणजे धर्म-निर्मूलन, देव-निर्मूलनच आहे असा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असतात. ब-याचदा हया मागे चुकीची समजूत असते, तर काहीवेळा मात्र स्वतःच्या धंद्यावर गदा येण्याच्या भीतीपोटी स्वार्थी हेतूने व स्वसंरक्षणाच्या अट्टाहासाने असे आरोप केले जातात.
ज्यांचा गैरसमज झाला आहे अशांना आमची भूमिका व्यवस्थितरीत्या समजावून देऊन त्यांचे गैरसमज दूर करणे हे आमचे कर्तव्य असल्याने व जनप्रबोधनाचाच तो एक भाग असल्याने आम्ही हे मुद्याम स्पष्ट करीत आहोत.
अंनिसची निर्मिती !
२९ वर्षापूर्वी महाराष्ट्रात रॅशनॅलिस्ट असोसिएशन, बुध्दिप्रामाण्यवादी मंच, मानवीय नास्तिक मंच, लोक विज्ञान संघटना जमेल त्याप्रमाणे व आपल्या विचारला अनुकूल वाटेल तेवढे अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत होत्या.
या पार्श्वभूमीवर या विविध संघटनांमधील काही समविचारी मंडळींचे सहकार्य घेऊन प्रा. श्याम मानव यांनी आखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीची निर्मिती केली.
प्राध्यापक व पत्रकारितेची नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्यास वाहून घेतल्यामुळे त्यांना पूर्ण ताकदीने व तडफेने काम करता आले.
विविध संघटनांमधल्या शेकडो मित्रांचे व नव्याने सामील झालेल्या हजारो कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत गेले. अगदी चळवळ सुरू करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच मानवी जीवन सुसह्य करणा-या देवावर व धर्मावर हल्ले न करता, उघड अंधश्रध्दा व देवा-धर्माच्या नांवावर लोकांना लुबाडणार्या दलालांविरुध्द लढा द्यायचा असा आम्ही निश्चय केला होता. सुरुवातीला आमच्यातील विविध पुरोगामी विचारांच्या लोकांना 'देवा-धर्माला' विरोध न करण्याची भूमिका पचवणे फारच जड गेले, त्यावर वादविवाद होत गेले. पण जसजसे चळवळीचे यश वाढत गेले, जनतेचा प्रतिसाद वाढत गेला, कोणत्याही विचारांची पार्श्वभूमी नसलेले नवखे हजारो कार्यकर्ते चळवळीत सामील होत गेले; तसतशी ही भूमिका कमी विवाद्य बनत गेली व चळवळीचा अपरिहार्य भाग बनली.